उपदेशक ४:१-१६
४ मग मी सूर्याखाली होणाऱ्या जुलमांवर पुन्हा विचार केला. मी पीडितांचे अश्रू पाहिले, पण त्यांना सांत्वन देणारं कोणीही नव्हतं.+ त्यांच्यावर जुलूम करणाऱ्यांकडे सत्ता होती, खरंच, पीडितांचं सांत्वन करणारं कोणीच नव्हतं.
२ म्हणून जे जिवंत आहेत त्यांचं अभिनंदन करण्याऐवजी, मी मेलेल्यांचं अभिनंदन केलं.+
३ आणि ज्याचा अजून जन्म झाला नाही, तो तर या दोघांपेक्षाही चांगला आहे.+ कारण त्याने सूर्याखाली होणारी वाईट कृत्यं पाहिलेली नाहीत.+
४ लोक चढाओढीमुळे खूप मेहनत करतात आणि कौशल्याने काम करतात, हे मी पाहिलं आहे;+ पण हेही व्यर्थ आणि वाऱ्यामागे धावण्यासारखंच आहे.
५ मूर्ख हाताची घडी घालून बसतो आणि स्वतःचा नाश करतो.+
६ वाऱ्यामागे धावण्यापेक्षा आणि कष्टाने भरलेल्या दोन मुठींपेक्षा, विश्रांतीची एक मूठ चांगली.+
७ सूर्याखाली होणाऱ्या आणखी एका व्यर्थ गोष्टीबद्दल मी पुन्हा विचार केला:
८ एक असा माणूस आहे जो एकटाच राहतो. त्याला कोणीही सोबती नाही. त्याला मुलगा नाही किंवा भाऊही नाही, पण तो खूप मेहनत करतो. खूप श्रीमंती पाहूनही त्याचे डोळे तृप्त होत नाहीत.+ पण, तो स्वतःला असं विचारत नाही, “मी इतके कष्ट कोणासाठी करतोय? मी थोडी मौजमजा का करत नाही?”+ हे दुःख देणारं काम आहे. हेही व्यर्थच आहे.+
९ एकापेक्षा दोघं चांगले,+ कारण त्यांच्या मेहनतीचं त्यांना चांगलं फळ मिळतं.*
१० कारण त्यांच्यातला एक पडला, तर दुसरा त्याला मदत करू शकतो. पण ज्याला मदत करणारं कोणी नाही असा माणूस पडला, तर त्याचं काय होईल?
११ दोघं एकत्र झोपले तर त्यांना ऊब मिळते, पण एकट्याला ऊब कशी मिळेल?
१२ एखादा माणूस एकट्यावर वरचढ होईल, पण दोघं असले तर ते त्याचा सामना करू शकतील. तीन धाग्यांनी बनलेली दोरी सहजासहजी* तुटत नाही.
१३ सल्ला न मानणाऱ्या+ वृद्ध आणि मूर्ख राजापेक्षा, गरीब आणि बुद्धिमान तरुण चांगला!+
१४ कारण तो* जरी वृद्ध राजाच्या राज्यात गरीब म्हणून जन्माला आला, तरी तो तुरुंगातून निघून राजा बनला.+
१५ सूर्याखाली चालणाऱ्या सर्व लोकांबद्दल मी विचार केला. तसंच, राजाची जागा घेणाऱ्या तरुणाचं काय होईल, यावरही मी विचार केला.
१६ जरी त्याने पुष्कळ लोकांवर राज्य केलं, तरी नंतर येणारे त्याच्यावर खूश होणार नाहीत.+ हेही व्यर्थ आणि वाऱ्यामागे धावण्यासारखंच आहे.